शास्ती माफी'चा तिढा सुटला, उपमुख्यमंत्र्यांच्या एका फोनने संगमनेरकरांना मिळाला मोठा दिलासा
उपमुख्यमंत्र्यांच्या थेट हस्तक्षेपामुळे शास्ती माफी योजनेचा लाभ संगमनेरकरांना मिळणार,आयुक्त अभिषेक कृष्णा यांच्याकडूनही सकारात्मक मार्ग,आ खताळ
संगमनेर प्रति: दि 1 ऑक्टोबर 2025 रोजी मिळालेल्या माहितीनुसार, मालमत्ता करावरील शास्ती माफी योजनेच्या अंमलबजावणीतील तांत्रिक अडथळे आता लवकरच दूर होणार आहेत! संगमनेरचे आक्रमक आमदार अमोल खताळ यांनी थेट उपमुख्यमंत्री आणि राज्याचे नगरविकासमंत्री एकनाथ शिंदे यांच्याशी दूरध्वनीवर संपर्क साधून हा प्रलंबित विषय मार्गी लावला. उपमुख्यमंत्र्यांनी १५ दिवसांत ठोस निर्णय घेण्याची ग्वाही दिल्याने हजारो संगमनेरकर करदात्यांना प्रचंड मोठा दिलासा मिळाला आहे
नेमका काय होता अडथळा?
शासनाने अभय योजना जाहीर केली खरी, पण संगमनेर नगर परिषदेसमोर मोठी अडचण उभी राहिली होती. 31 मार्च 2025 पर्यंतची थकबाकी रक्कम शासनाच्या Integrated Web Based Portal (IWBP) वर दिसतच नव्हती. त्यामुळे ही 'शास्ती माफी फक्त कागदावर राहिली होती आणि नागरिकांना योजनेचा लाभ मिळत नव्हता. नागरिकांमध्ये तीव्र नाराजी होती. या गंभीर प्रश्नावर आमदार अमोल खताळ यांनी तातडीने दखल घेतली. त्यांनी नगरपरिषद प्रशासनातील अडचणींसह पोर्टलवरील ही अपूर्ण नोंद थेट उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासमोर फोनद्वारे मांडली.वेळेत दिलासा न मिळाल्यास करदात्यांवर मोठा अन्याय होईल, असे खताळ यांनी उपमुख्यमंत्र्यांच्या निदर्शनास आणले. आमदार खताळ यांची मागणी फोन वर गांभीर्याने ऐकून घेत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी तत्काळ कार्यवाही करण्याचे निर्देश दिले आहेत. त्यांनी पुढील १० ते १५ दिवसांमध्ये शास्तीकर माफीच्या अंमलबजावणीतील तांत्रिक त्रुटी दूर करून ठोस निर्णय घेतला जाईल, असे ठाम आश्वासन दिले आहे. याशिवाय, आमदार खताळ यांनी नगरपरिषद प्रशासन संचालनालयाचे आयुक्त अभिषेक कृष्णा यांच्याकडूनही सकारात्मक मार्ग काढण्याचे आश्वासन घेतले आहे. उपमुख्यमंत्र्यांच्या या थेट हस्तक्षेपामुळे शास्ती माफी योजनेचा लाभ पुढील काही दिवसांत संगमनेरकरांना मिळणार असल्याने शहरातील नागरिकांनी समाधान व्यक्त केले आहे.यावेळी माजी उपनगराध्यक्ष जावेदभाई जागीरदार राहुल भोईर शशांक नमन उपस्थित होते
Post a Comment