नगराध्यक्षा मैथिलीताई तांबे व मुख्याधिकारी गोरे यांना निवेदन उपजिल्हाप्रमुख अमर कतारी यांचा इशारा :
संगमनेर प्रती: दि 27 मार्च 2026 रोजी मिळालेल्या माहितीनुसार,नगरपालिकेच्या वतीने शहरात राबविण्यात येत असलेली अतिक्रमण मोहीम अन्यायकारक आणि भेदभाव करणारी असल्याचा आरोप करत, शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या वतीने नगराध्यक्षा मैथिलीताई तांबे व मुख्याधिकारी गोरे यांना निवेदन देण्यात आले. "गरिबांच्या टपऱ्यांवर बुलडोझर फिरवताना गर्भश्रीमंतांच्या इमारतींना अभय का?" असा संतप्त सवाल या निवेदनातून उपस्थित करण्यात आला असून, तातडीने तोडगा न निघाल्यास तीव्र आंदोलनाचा इशारा देण्यात आला आहे. नवीन नगर रोड परिसरातील अतिक्रमण हटवण्यात आले, मात्र शहरातील इतर भागांत अद्यापही 'जैसे थे' परिस्थिती आहे. केवळ ठराविक भागालाच लक्ष्य केले जात असल्याचा आरोप शिवसेनेने केला आहे.शहरात अनेक मोठ्या इमारतींना पार्किंगची सुविधा नाही. त्यांचे ग्राहक रस्त्यावरच वाहने उभी करतात, ज्यामुळे वाहतुकीला अडथळा होतो. तरीही या बड्या मालकांवर नगरपालिका प्रशासन मेहेरबान का, असा प्रश्न विचारला जात आहे.या मोहिमेमुळे स्थानिक दुकानदार, अल्पभूधारक शेतकरी, भाजी विक्रेते आणि चहा टपरीधारक देशोधडीला लागले आहेत. अनेकांच्या कुटुंबावर उपासमारीची वेळ आली आहे. विशेष म्हणजे, स्थानिक व्यावसायिकांवर कारवाई होत असताना, दुपारी ४ नंतर रस्ते व्यापणाऱ्या बाहेरील राज्यातील फेरीवाल्यांवर (पाणीपुरी, मोमोज, चायनीज विक्रेते) प्रशासन मेहेरबान असल्याचा आरोप निवेदनात केला आहे. तसेच काही ठिकाणी खाद्यपदार्थांच्या गाड्यांवर मद्यप्राशनास मूकसंमती मिळत असल्याचेही निदर्शनास आणून दिले आहे.
------------- शिवसेनेच्या प्रमुख मागण्या------------- ज्या व्यावसायिकांवर कारवाई केली, त्यांना व्यवसायासाठी तातडीने पर्यायी जागा उपलब्ध करून द्यावी. समान न्याय: संपूर्ण संगमनेर शहरात कोणत्याही दबावाशिवाय समान पद्धतीने अतिक्रमण मोहीम राबवावी. कायमस्वरूपी पुनर्वसन: सर्व लघु व्यावसायिकांसाना पालिकेने नियोजित व्यापारी संकुल किंवा कायमस्वरूपी जागा निश्चित करावी.
-------------- सबंधित प्रशासनास इशारा -------------- "जर प्रशासनाने या मागण्यांकडे दुर्लक्ष केले, तर अन्याय झालेल्या दुकानदार आणि त्यांच्या कुटुंबीयांसह शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या वतीने नगरपालिकेच्या प्रांगणात तीव्र आंदोलन छेडण्यात येईल," असा इशारा उपजिल्हाप्रमुख अमर कतारी यांनी निवेदनाद्वारे दिला आहे.
Post a Comment