March 2026

आमदार सत्यजीत तांबेंनी मानले मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे आभार,- पारेगाव सौर प्रकल्पाला गती;



संगमनेर प्रती: दि.28 मार्च 2026 रोजी मिळालेल्या माहितीनुसार, तालुक्यातील पारेगाव येथे प्रस्तावित ५ मेगावॅट क्षमतेचा सौर ऊर्जा प्रकल्प अनेक वर्षांपासून विविध वादांमुळे रखडला होता. मात्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या तत्पर हस्तक्षेपामुळे या प्रकल्पाला अखेर गती मिळाली असून आमदार सत्यजित तांबे यांनी राज्य शासनाचे आभार मानले आहेत.

------------ मिळालेल्या माहितीनुसार?---------------
या प्रकल्पामुळे मोठ्या प्रमाणात वृक्षतोड होणार असल्याच्या भीतीने ग्रामस्थांनी तीव्र विरोध दर्शविला होता. जयहिंद लोकचळवळीच्या माध्यमातून या भागात मोठ्या प्रमाणावर वृक्षारोपण करण्यात आले होते. याच पार्श्वभूमीवर ग्रामस्थ आणि कंपनीमध्ये मतभेद निर्माण होऊन प्रकरण थेट सुप्रीम कोर्टापर्यंत पोहोचले. न्यायालयाने ग्रामस्थांच्या बाजूने निर्णय दिल्यानंतरही प्रकल्पाचा प्रश्न प्रलंबितच राहिला होता.
या सगळ्या विषयाची माहिती घेऊन १८ मार्च २०२६ रोजी अर्थसंकल्पीय अधिवेशनादरम्यान आमदार सत्यजित तांबे यांनी हा प्रश्न सभागृहात उपस्थित केला. त्यानंतर मुख्यमंत्री फडणवीस यांनी तात्काळ दखल घेत “गावकऱ्यांना विश्वासात घेऊनच प्रकल्पाची अंमलबजावणी केली जाईल,” अशी ग्वाही दिली होती.
मुख्यमंत्र्यांच्या निर्देशानुसार जिल्हाधिकारी डॉ. पंकज आशिया यांच्या पुढाकाराने संगमनेर येथे बैठक घेण्यात आली. या बैठकीत ग्रामस्थांच्या सर्व प्रमुख मागण्या मान्य करण्यात आल्या. परिणामी आज या प्रकल्पाच्या कामाला देखील प्रत्यक्ष सुरुवात झाली आहे. मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजना’ अंतर्गत उभारला जाणारा हा प्रकल्प पारेगावसह परिसरातील शेतकऱ्यांना दिवसा वीज उपलब्ध करून देण्यासाठी महत्त्वाचा ठरणार आहे.--------------------- चौकट --------------------

गावकऱ्यांनी मानले विशेष आभार -  या संपूर्ण प्रकरणात आमदार सत्यजीत तांबे यांनी तत्काळ दखल घेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे हा विषय लावून धरला तसेच अर्थसंकल्पीय अधिवेशनात देखील हा मुद्दा मांडल्याबद्दल समस्त गावकऱ्यांनी सत्यजित तांबे यांचे विशेष आभार 👏मानले.

---------------------------------------------------

नगराध्यक्षा मैथिलीताई तांबे व मुख्याधिकारी गोरे यांना निवेदन उपजिल्हाप्रमुख अमर कतारी यांचा इशारा :



​संगमनेर प्रती: दि 27 मार्च 2026 रोजी मिळालेल्या माहितीनुसार,नगरपालिकेच्या वतीने शहरात राबविण्यात येत असलेली अतिक्रमण मोहीम अन्यायकारक आणि भेदभाव करणारी असल्याचा आरोप करत, शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या वतीने नगराध्यक्षा मैथिलीताई तांबे व मुख्याधिकारी गोरे यांना निवेदन देण्यात आले. "गरिबांच्या टपऱ्यांवर बुलडोझर फिरवताना गर्भश्रीमंतांच्या इमारतींना अभय का?" असा संतप्त सवाल या निवेदनातून उपस्थित करण्यात आला असून, तातडीने तोडगा न निघाल्यास तीव्र आंदोलनाचा इशारा देण्यात आला आहे. नवीन नगर रोड परिसरातील अतिक्रमण हटवण्यात आले, मात्र शहरातील इतर भागांत अद्यापही 'जैसे थे' परिस्थिती आहे. केवळ ठराविक भागालाच लक्ष्य केले जात असल्याचा आरोप शिवसेनेने केला आहे.शहरात अनेक मोठ्या इमारतींना पार्किंगची सुविधा नाही. त्यांचे ग्राहक रस्त्यावरच वाहने उभी करतात, ज्यामुळे वाहतुकीला अडथळा होतो. तरीही या बड्या मालकांवर नगरपालिका प्रशासन मेहेरबान का, असा प्रश्न विचारला जात आहे.या मोहिमेमुळे स्थानिक दुकानदार, अल्पभूधारक शेतकरी, भाजी विक्रेते आणि चहा टपरीधारक देशोधडीला लागले आहेत. अनेकांच्या कुटुंबावर उपासमारीची वेळ आली आहे. विशेष म्हणजे, स्थानिक व्यावसायिकांवर कारवाई होत असताना, दुपारी ४ नंतर रस्ते व्यापणाऱ्या बाहेरील राज्यातील फेरीवाल्यांवर (पाणीपुरी, मोमोज, चायनीज विक्रेते) प्रशासन मेहेरबान असल्याचा आरोप निवेदनात केला आहे. तसेच काही ठिकाणी खाद्यपदार्थांच्या गाड्यांवर मद्यप्राशनास मूकसंमती मिळत असल्याचेही निदर्शनास आणून दिले आहे.

------------- शिवसेनेच्या प्रमुख मागण्या -------------
ज्या व्यावसायिकांवर कारवाई केली, त्यांना व्यवसायासाठी तातडीने पर्यायी जागा उपलब्ध करून द्यावी.
समान न्या: संपूर्ण संगमनेर शहरात कोणत्याही दबावाशिवाय समान पद्धतीने अतिक्रमण मोहीम राबवावी.
कायमस्वरूपी पुनर्वसन: सर्व लघु व्यावसायिकांसाना पालिकेने नियोजित व्यापारी संकुल किंवा कायमस्वरूपी जागा निश्चित करावी.

-------------- सबंधित प्रशासनास इशारा --------------
​"जर प्रशासनाने या मागण्यांकडे दुर्लक्ष केले, तर अन्याय झालेल्या दुकानदार आणि त्यांच्या कुटुंबीयांसह शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या वतीने नगरपालिकेच्या प्रांगणात तीव्र आंदोलन छेडण्यात येईल," असा इशारा उपजिल्हाप्रमुख अमर कतारी यांनी निवेदनाद्वारे दिला आहे.

नाशिक-पुणे आणि कोल्हार-घोटी रस्त्यावर कोंडीचा विळखा; १२ मार्चचे पत्र केराच्या टोपलीत?



​संगमनेर प्रती: दि.25 मार्च2026 रोजी मिळालेल्या माहितीनुसार, शहरातील वाहतूक कोंडी आणि अपघातांना कारणीभूत ठरणारे अतिक्रमण हटविण्याबाबत संगमनेर नगरपालिका आक्रमक झाली असली, तरी सार्वजनिक बांधकाम विभाग (PWD) मात्र कमालीचा निष्क्रिय दिसून येत आहे. नगरपालिकेने १२ मार्च रोजी लेखी पत्र देऊनही PWD कडून कोणतीही कार्यवाही न झाल्याने नागरिकांमधून संताप व्यक्त होत आहे.

                 नेमकी समस्या काय?
संगमनेर शहरातील नाशिक-पुणे राज्य महामार्ग (SH 71A) आणि कोल्हार-घोटी राज्यमार्ग हे अत्यंत वर्दळीचे रस्ते आहेत. या रस्त्यांच्या दुतर्फा फेरीवाले, दुकानदार आणि काही ठिकाणी पक्क्या बांधकामांद्वारे मोठे अतिक्रमण झाले आहे. यामुळे रस्ते अरुंद झाले असून, पादचाऱ्यांना चालणेही कठीण झाले आहे.
​              
अतिक्रमणाचे 'हॉटस्पॉट' क्षेत्र:
​१३२ के.व्ही. सबस्टेशन ते पुणे रोड परिसर.
​छत्रपती शिवाजी महाराज स्मारक ते प्रवरा नदी पूल.
​तीन बत्ती चौक ते अकोले नाका मार्ग.
​नगरपालिकेचा पाठपुरावा, पण PWD गप्प!
​नगरपालिका प्रशासनाने या समस्येचे गांभीर्य ओळखून १२ मार्च २०२६ रोजी सार्वजनिक बांधकाम विभागाला दोन सविस्तर पत्रे पाठवली होती
. जे या बातमीच्या माध्यमातून नागरिकांमध्ये प्रसिद्ध केले आहे 

  यामध्ये खालील मागण्या करण्यात आल्या होत्या:

१. संबंधित रस्त्यांची हद्द निश्चित करणे.
२. बाधित मिळकतधारकांची यादी तयार करून नोटिसा बजावणे.
३. संयुक्त मोहीम राबवून अतिक्रमण जमीनदोस्त करणे.
​वस्तुस्थिती: पत्र देऊन दोन आठवडे उलटले तरी PWD विभागाने साधी जागेची पाहणी करण्याची तसदीही घेतलेली नाही. ना हद्द निश्चिती झाली, ना अतिक्रमणधारकांवर कारवाई
.

​           नागरिकांच्या रोषाला जबाबदार कोण?
​वाढत्या अतिक्रमणामुळे शहरात दररोज लहान-मोठे अपघात होत आहेत. वाहतूक कोंडीत तासनतास अडकून पडणाऱ्या नागरिकांचा संयम आता सुटत चालला आहे. "प्रशासन केवळ कागदी घोडे नाचवत असून प्रत्यक्ष कृती शून्य आहे," अशी भावना शहरवासीयांमध्ये आहे.

                      प्रशासनाचा इशारा

नगरपरिषद प्रशासनाने पुन्हा एकदा PWD विभागाला कडक शब्दांत आठवण करून दिली आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाने तातडीने जागेवर येऊन कारवाई सुरू न केल्यास, निर्माण होणाऱ्या जनरोषाला सर्वस्वी हा विभागच जबाबदार असेल, असा इशारा पालिकेने दिला आहे.


प्रतिनिधी; रफिक सौदागर संगमनेर

माहिती देण्याचे आवाहन ​पीडितेची प्रकृती स्थिर,​पीडित मुलीवर प्रवरा मेडिकल ट्रस्ट (लोणी,) येथे उपचार सुरू; 




​संगमनेर प्रती; दि, 19 मार्च 2026 रोजी मिळालेल्या माहितीनुसार, वडगावपान येथे अल्पवयीन मुलीवर झालेल्या निर्घृण अॅसिड हल्ला प्रकरणातील अज्ञात आरोपीचे रेखाचित्र संगमनेर पोलिसांनी प्रसिद्ध केले आहे. या संशयित नराधमाची माहिती देणाऱ्याचे नाव गुप्त ठेवले जाईल, असे आवाहन अप्पर पोलीस अधीक्षक सोमनाथ वाकचौरे यांनी आमच्या प्रतिनिधीशी बोलताना  केले आहे.

​   --------------नेमकी घटना काय ?------------------ 
दिनांक १७/०३/२०२६ रोजी वडगावपान येथील एक अल्पवयीन मुलगी सायकलवरून जात असताना, हाडकीचा ओढा कडून जाणाऱ्या महादेव मळ्याकडील कच्च्या रस्त्यावर एका अज्ञात इसमाने (वय अंदाजे ३२ ते ३५) तिला पत्ता विचारण्याच्या बहाण्याने थांबवले. यावेळी त्याने सोबत आणलेल्या बाटलीतील अॅसिडसदृश्य द्रव पदार्थ मुलीच्या चेहऱ्यावर उजव्या बाजूने फेकून तिला गंभीर जखमी केले. याप्रकरणी संगमनेर तालुका पोलीस स्टेशनमध्ये गु. र. नं. १२६/२०२६ नुसार बी. एन. एस. कलम १२४(१), १२६(२) प्रमाणे अज्ञात इसमाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या गंभीर गुन्ह्याचा तपास वेगाने सुरु आहे. आरोपीला पकडण्यासाठी तांत्रिक विश्लेषण गुन्हे शोध पथक अहिल्यानगर, फॉरेन्सीक युनिट संगमनेर, संगमनेर शहर पोलीस स्टेशन आणि संगमनेर तालुका पोलीस स्टेशन या सर्वांची वेगवेगळी पथके तयार करून आरोपीचा शोध घेतला जात आहे. पीडित मुलीवर प्रवरा मेडिकल ट्रस्ट (लोणी, ता. राहता) येथे उपचार सुरू आहेत. तिची तब्येत सध्यातरी स्थिर आहे. येथे जनरल फिजिशियन, तज्ञ प्लास्टिक सर्जन आणि नेत्रतज्ज्ञ यांच्या मार्गदर्शनाखाली तिच्यावर आवश्यक ते उपचार केले जात आहेत.

​------------ पोलिसांचे जनतेला आवाहन --------
तपासादरम्यान प्रत्यक्षदर्शी साक्षीदारांशी चर्चा करून आणि त्यांनी दिलेल्या माहितीवरून पोलिसांनी संशयित आरोपीचे रेखाचित्र तयार केले आहे. हे रेखाचित्र सोबत प्रसिद्ध करण्यात आले आहे.

या रेखाचित्रातील अज्ञात आरोपीबाबत कुणाकडेही खात्रीशीर माहिती असल्यास किंवा कुणी त्याला ओळखत असल्यास त्यांनी खालील क्रमांकांवर तातडीने संपर्क साधावा. माहिती देणाऱ्याचे नाव पूर्णपणे गुप्त ठेवण्यात येईल, असे आश्वासन प्रशासनाने दिले आहे.


​------/-/--------संपर्क क्रमांक:-----/-/-------
प्रविण साळुंखे (पोलीस निरीक्षक) - ९६८९९०३५८८
​संगमनेर तालुका पोलीस स्टेशन - ०२४२५-२२५४३३
​व्ही. एन. काळे (सहा. पोलीस निरीक्षक) - ९८२२३००२३३
​महेश व्ही. शिंदे (पोलीस उपनिरीक्षक) - ९५२७९३०९९७

बिबट्या हल्ल्यातील मृतांच्या कुटुंबीयांना नोकरीत प्राधान्य द्याव नविभागाच्या जमिनी बळकावण्याची चौकशी करण्याचेही आवाहन;


संगमनेर, प्रती, दि. १४ रोजी मिळालेल्या माहितीनुसार, मुंबई येथे सुरू असलेल्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात आमदार अमोल खताळ यांनी संगमनेर परिसरातील बिबट्यांच्या वाढत्या हल्ल्यांचा मुद्दा सभागृहात उपस्थित केला. बिबट्याच्या हल्ल्यात मृत्यू झालेल्या व्यक्तीच्या कुटुंबातील एका सदस्याला शासकीय नोकरीत प्राधान्य देण्यात यावे, अशी मागणी त्यांनी यावेळी केली. संगमनेर परिसरात बिबट्यांचे प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढले असून मानवी वस्तीत वारंवार हल्ल्यांच्या घटना घडत आहेत. या हल्ल्यांमध्ये अनेक नागरिक जखमी झाले असून काहींना आपला जीव गमवावा लागला आहे. त्यामुळे अशा दुर्घटनांमध्ये मृत्यू झालेल्या व्यक्तींच्या कुटुंबीयांना शासनाकडून मदत मिळणे आवश्यक आहे. त्यासाठी कुटुंबातील एका सदस्याला शासकीय नोकरीत प्राधान्य देण्याचा निर्णय सरकारने घ्यावा, अशी मागणी आमदार खताळ यांनी सभागृहात केली.पुढे बोलताना आमदार खताळ म्हणाले की, तालुक्यातील कऱ्हे, डोळासणे, चिकणी, अंभोरे, धांदरफळ खुर्द आणि निमज या गावांसह नाशिक जिल्ह्यातील इगतपुरी, शहापूर, घोटी बुद्रुक आणि घोटी खुर्द या भागांमध्ये वनविभागाच्या जमिनी बनावट कागदपत्रांच्या आधारे बळकावल्याच्या तक्रारी प्राप्त झाल्या आहेत. या प्रकरणाची सखोल चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करण्यात यावी, अशी मागणीही त्यांनी केली. संगमनेर येथील उपविभागीय वनाधिकारी कार्यालय नगर येथे वर्ग केल्यामुळे संगमनेर व अकोले तालुक्यातील नागरिकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. त्यामुळे हे कार्यालय पूर्ववत संगमनेर येथे सुरू करण्यात यावे.याचबरोबर संगमनेर येथे स्वतंत्र वनभवन उभारण्यासाठी शासनाने निधी उपलब्ध करून द्यावा. तसेच वनहक्क कायद्यांतर्गत आदिवासी व वनपरिसरातील नागरिकांचे मोठ्या प्रमाणावर अर्ज प्रलंबित आहेत. संगमनेर मतदारसंघातील महसूल व वनविभागाशी संबंधित प्रलंबित प्रश्न सोडवण्यासाठी शासनाने विशेष मोहीम राबवावी, अशी विनंतीही आमदार अमोल खताळ यांनी सरकारकडे केली.

धांदरफळ बुद्रुक येथे विविध सामाजिक उपक्रमांना उत्स्फूर्त प्रतिसाद


संगमनेर (प्रति) दि.५मार्च२०२५ रोजी मिळालेल्या माहितीनुसार, तालुक्यातील धांदरफळ बुद्रुक येथील भूमिपुत्र आणि प्रसिद्ध उद्योजक बाळासाहेब भास्करराव देशमाने यांचा वाढदिवस केवळ शुभेच्छांचा वर्षाव न ठरता सामाजिक उत्तरदायित्वाचा सोहळा ठरला. स्वदेश युवा प्रतिष्ठान, स्वदेश सामाजिक सेवाभावी संस्था आणि ग्रामपंचायत धांदरफळ बुद्रुक यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित विविध आरोग्य व प्रशासकीय शिबिरांनी या वाढदिवसाला अनोखी उंची प्राप्त करून दिली.बाळासाहेब देशमाने हे नेहमीच ग्रामविकास आणि धार्मिक कार्यात अग्रेसर असतात. त्यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून यावर्षी 'मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियान' अंतर्गत अनेक उपक्रम राबवण्यात आले. 'असेल दृष्टी तर दिसेल सृष्टी' या मोहिमेअंतर्गत रोटरी आय केअर ट्रस्टच्या सहकार्याने ७५ नागरिकांची नेत्र तपासणी करण्यात आली. त्यापैकी ७ रुग्णांना मोतीबिंदू शस्त्रक्रियेसाठी रोटरी आय केअर हॉस्पिटलमध्ये मोफत उपचारांचे मार्गदर्शन व निवड करण्यात आली. देशातील रक्ताचा तुटवडा लक्षात घेता, अर्पण रक्तपेढीच्या माध्यमातून तरुण युवकांनी उत्स्फूर्तपणे रक्तदान करून श्री. देशमाने यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. धांदरफळ आरोग्य उपकेंद्राच्या मदतीने जिल्हा परिषद शाळेतील १०४ विद्यार्थ्यांची आरोग्य तपासणी करण्यात आली. यावेळी विद्यार्थ्यांना स्वच्छतेचे व आरोग्याचे महत्त्व पटवून देण्यात आले. संगमनेर येथील संग्राम निवास मूकबधिर विद्यालयातील विद्यार्थ्यांना स्नेहभोजन व अन्नदान करून देशमाने यांनी आपली सामाजिक संवेदनशीलता जपली. ग्रामप्रशासनाला आधुनिकतेची जोड देत यावेळी 'ई-रेशन कार्ड' आणि ग्रामपंचायत मालमत्तेची माहिती देणाऱ्या 'क्यूआर कोड' (QR Code) उपक्रमाचा शुभारंभ करण्यात आला. यामुळे ग्रामस्थांना घरबसल्या पाणीपुरवठा कर पावती आणि शासकीय योजनांची माहिती मिळणे सोपे होणार आहे. तसेच, साई समर्थ सेवा केंद्राच्या माध्यमातून ५५ ग्रामस्थ व विद्यार्थ्यांच्या आधार कार्डमधील चुकांची दुरुस्ती करण्यात आली. 'हिंद दी चादर' उपक्रमांतर्गत श्री क्षेत्र रामेश्वर देवस्थान ते श्री क्षेत्र देहू येथे जाणाऱ्या बीज यात्रा पालखी सोहळ्यातील भाविकांनी सामाजिक एकता, बंधुता आणि सहिष्णुतेचा संदेश दिला.त्याचबरोबर ​स्वदेश उद्योग समूहातील समीर परदेशी, योगेश देशमुख,  सतीश दुर्गुडे, गोपीनाथ नाईकवाडी, अमोल डेरे, सागर घोलप, अक्षय पानसरे, गंगाराम सातपुते, महेश देशमुख, रघु दिघे, निखिल सानप, निरंजन सातपुते, भारत घुले, अशोक सातपुते, सचिन पोकळे, नितेश जोशी,  संकेत करंजेकर यांच्या वतीने जीवदया गोशाळेसाठी चारा वाटप करण्यात आले. यावेळी गोशाळेचे व्यवस्थापक राजेश दोशी यांनी  सांगितले की, उन्हाळ्यात चारा-पाण्याच्या टंचाईच्या काळात स्वदेश परिवार नेहमीच आमच्या पाठीशी खंबीरपणे उभा असतो. तर स्वयंप्रेरित संस्थेचे अध्यक्ष संतोष पवार यांनी मूकबधिर विद्यार्थ्यांच्या भोजन व्यवस्थेबद्दल कृतज्ञता व्यक्त करत, हा वाढदिवस म्हणजे माणुसकीचे दर्शन घडवणारा सोहळा असल्याचे म्हटले.या कार्यक्रमाला स्वदेश युवा प्रतिष्ठानचे अध्यक्ष नवनाथ देशमाने, नवनाथ नाईकवाडी, मोहन देशमाने, सचिन देशमाने, अविनाश देशमुख, राजेश शिंदे, किरण वाकचौरे, रोहन बनकर, दत्ता कासार, रामेश्वर देवस्थानचे अध्यक्ष सुनील देशमुख, माजी सभापती अनिल देशमुख, तंटामुक्ती अध्यक्ष शिवाजी काळे, सरपंच सौ. उज्वला नवनाथ देशमाने, ग्रामविकास अधिकारी सुरेश मंडलिक आणि पंचक्रोशीतील ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. डॉ. सुप्रिया तोरकडी, डॉ. गौरव देवळे, संदीप घुले, नितीन कढणे, सुजाता वाकचौरे व त्यांच्या टीमने या उपक्रमांच्या यशस्वीतेसाठी विशेष परिश्रम घेतले. वाढदिवसाच्या निमित्ताने राबवण्यात आलेल्या या 'लोकाभिमुख' उपक्रमांचे तालुक्यात सर्वत्र कौतुक होत आहे.

नगरपरिषदेकडून ५ ते ७ मार्च दरम्यान थेट मतदानाचे आयोजन. हे स्मारक सर्वांच्या पसंतीचे असावे ;


​संगमनेर (प्रति):दि.४ मार्च २०२६ रोजी मिळालेल्या माहितीनुसार, संगमनेर शहराच्या वैभवात भर घालणाऱ्या व अस्मितेचे केंद्र असलेल्या छत्रपती शिवाजी महाराज यांच्या भव्य स्मारकाच्या उभारणीसाठी संगमनेर नगरपरिषदेने एक ऐतिहासिक पाऊल उचलले आहे. बसस्थानकासमोरील प्रस्तावित स्मारकाचे स्वरूप नेमके कसे असावे, यासाठी शहरातील नागरिकांचे थेट मत जाणून घेण्याकरिता दि. ५ ते ७ मार्च २०२६ रोजी दरम्यान विशेष मतदान प्रक्रियेचे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती नगराध्यक्ष डॉ. मैथिली तांबे यांनी दिली आहे.बसस्थानकासमोरील १५ बाय १५ मीटरची मोक्याची जागा स्मारकासाठी मिळावी, यासाठी लोकनेते बाळासाहेब थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली आमदार सत्यजीत तांबे यांनी १८ डिसेंबर २०२३ पासून राज्य शासनाकडे सातत्यपूर्ण पाठपुरावा केला होता. तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या मान्यतेने ही जागा आता नगरपालिकेकडे वर्ग करण्यात आली असून, यामुळे स्मारकाचा मार्ग प्रशस्त झाला आहे.स्मारकाच्या स्वरूपाबाबत शहरातील शिवप्रेमींमध्ये विविध मते आहेत. कोणाला 'अश्वारूढ' स्मारक हवे आहे, तर कोणाला 'सिंहासनाधीश्वर' किंवा 'उभे पूर्णाकृती' स्मारक हवे आहे. नागरिकांच्या या भावनांचा आदर करत नगरपरिषदेने लोकसहभागातून निर्णय घेण्याचे ठरवले आहे

१) पूर्णाकृती उभे स्मारक २) पूर्णाकृती सिंहासनाधीश्वर स्मारक ३) पूर्णाकृती अश्वारूढ स्मारक स्थळ: संगमनेर बसस्थानक, सुप्रीम पावभाजी समोर. कालावधी: ५, ६ आणि  मार्च २०२६. नागरिकांसमोर स्मारकाच्या तीन संभाव्य ३डी (3D) प्रतिमा ठेवल्या जाती शहराच्या मध्यवर्ती भागात छत्रपतींचे प्रेरणादायी स्मारक उभे राहणार आहे. हे स्मारक सर्वांच्या पसंतीचे असावे, या उद्देशाने आम्ही ही मतदान प्रक्रिया राबवत आहोत. संगमनेरकरांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून आपले अमूल्य मत नोंदवावे," असे आवाहन संगमनेर नगरपरिषदेच्या वतीने करण्यात आले आहे.

भव्य शिवजन्मोत्सव सोहळा व ऐतिहासिक मिरवणूक


संगमनेर प्रति; दि 4 मार्च2026 रोजी मिळालेल्या माहितीनुसार, हिंदू समाज व शिवसेना-भाजपा महायुती, संगमनेर यांच्या वतीने शुक्रवार दिनांक ६ मार्च रोजी दुपारी ४ वाजता छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त भव्य शिवजन्मोत्सव सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. तिथीनुसार साजऱ्या होणाऱ्या शिवजयंतीनिमित्त संपूर्ण शहरातून दिमाखदार मिरवणूक काढण्यात येणार असून शिवप्रेमींमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे.या भव्य मिरवणुकीची सुरुवात संगमनेर नगरपरिषद येथून होणार आहे. त्यानंतर मिरवणूक लालबहादूर शास्त्री चौक, बाजारपेठ, तेली खुंट, सय्यद बाबा चौक, मेन रोड, चावडी, अशोक चौक, छत्रपती शिवाजी महाराज स्मारक मार्गे पुढे जात बसस्थानक येथे सांगता होणार आहे. संपूर्ण मार्गावर ठिकठिकाणी स्वागत कमानी, फुलांची सजावट आणि शिवमय वातावरणाची निर्मिती करण्यात येणार आहे.मिरवणुकीत विविध पारंपरिक व ऐतिहासिक देखावे सादर केले जाणार असून त्यामध्ये सनई-चौघडे, शिवछत्रपती गौरव पालखी, अश्वदर्शन, हिंदू जनजागृती घोष पथक, मर्दानी खेळ, तसेच आदि योगी महादेव यांचा देखावा यांचा समावेश असणार आहे. याशिवाय अफजलखान वधाचा जिवंत देखावा विशेष आकर्षण ठरणार असून अघोरींचा देखावा, किंग स्टार ब्रास बँड पथक (मावळ) आणि एकलव्य ढोल-ताशा पथक यांच्या दमदार सादरीकरणामुळे वातावरण शिवमय होणार आहे. ढोल-ताशांच्या गजरात आणि जयघोषात संपूर्ण संगमनेर दुमदुमून जाणार आहे.शिवसेना-भाजपा महायुतीच्या वतीने संगमनेरमधील सर्व शिवप्रेमी, युवक, महिला व नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून शिवजन्मोत्सव सोहळ्यात सहभागी व्हावे, असे आवाहन करण्यात आले आहे. याचबरोबर छत्रपती शिवाजी महाराजांच्या कार्याचा आणि विचारांचा जागर करण्यासाठी तसेच नव्या पिढीपर्यंत स्वराज्याचा संदेश पोहोचविण्याच्या उद्देशाने हा सोहळा आयोजित करण्यात आल्याचे आयोजकांनी सांगितले.

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget